भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदारांच्या संख्येने विधानसभेतील बहुमताचा आकडा सहज पार केला. यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात या दोन गटातील आमदारांना व काही अपक्षांना संधी मिळणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे. यामुळे सत्तेत थेट सहभागाची आपली संधी जाण्याच्या भीतीने भाजपच्या जुन्या मित्रपक्षांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. महादेव जानकर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता धुसर असल्याने त्यांची अस्वस्थता वाढली असतानाच आता केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांची रिपाइंदेखील याच वाटेवर आहे.
साडे सात वर्षापूर्वी राज्यात भाजप आणि सेनेची युती सत्तेवर आली. तेव्हा त्यांच्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपाइं, शिवसंग्राम असे अनेक पक्ष होते. दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या सर्वच पक्षांना मंत्रिपद आणि महामंडळ मिळाले. सरकारमधून स्वाभिमानी संघटना बाहेर पडल्यानंतर रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून खोत यांचे मंत्रिपद कायम राहिले. अडीच वर्षापूर्वी भाजपची सत्ता गेली तरी हे सारे पक्ष मात्र त्यांच्यासोबत कायम राहिले.
नव्या राजकीय घडामोडीत शिंदे गटाने भाजपला साथ दिल्याने राज्यात पुन्हा या पक्षाची सत्ता आली. या दोघांचे आमदार एकत्र आल्याने बहुमताचा आकडा सहज पार झाला. घटक पक्ष व अपक्षासह १६४ आमदार त्यांच्यासोबत आहेत. सध्या या दोन गटांनाच मंत्रिपद देण्याबाबत हालचाली सुरू आहेत. या गटाबरोबर आलेले प्रहार जनशक्ती, बहुजन विकास पार्टी तसेच जुना मित्र असलेल्या जनसुराज्य पक्षाला मंत्रिपद मिळणार हे जवळजवळ निश्चित आहे. मनसेलादेखील यामध्ये लॉटरी लागू शकते. कारण या सर्व पक्षाचे विधानसभेत एक ते तीन आमदार आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर जुने मित्रपक्ष असलेल्या नेत्यांची मात्र अस्वस्थता वाढली आहे. जानकर, खोत, मेटे यांची नावे मंत्रिपदाच्या शर्यतीत कुठेच दिसत नाहीत. हीच अवस्था रिपाइंची आहे. रासपचा एक आमदार असूनही जानकरांच्या अनेक जुन्या अटींच्या पार्श्वभूमीवर भाजप त्यांच्याकडे कानाडोळा करत आहे. मंत्री आठवले यांनी मनसेला मंत्रिपद देण्यास विरोध करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मंत्रिपद राहू दे किमान महामंडळ मिळावे अशी अपेक्षा काही नेत्यामधून व्यक्त केली जात आहे.
खोत यांच्या विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची मुदत संपली आहे. तेथे पुन्हा संधी मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे. मेटेही याच प्रतिक्षेत आहेत. मंत्रिपदे कमी आणि इच्छुक जास्त अशी परिस्थिती असल्याने जुन्या घटक पक्षांना विधान परिषद अथवा महामंडळावरच समाधान मानावे लागण्याची चिन्हे आहेत.
भाजपबरोबर असलेल्या सर्व जुने आणि नव्या मित्रपक्षांना सत्तेत नक्की वाटा मिळेल अशी अपेक्षा आहे. हा पक्ष मित्रांना सोबत घेऊन जाणारा असल्याने जुन्या घटक पक्षांना पहिल्या किंवा दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात नक्कीच संधी देतील असा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली.
