कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं भाजप व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला आहे. चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
शिवसेनेला संपविण्याचा पालकमंत्री सतेज पाटील व राष्ट्रवादीचा यांचा डाव आहे असा टोला मारतानाच कोल्हापूरला थेट पाईपलाइनचे पाणी दिले नाही तर निवडणूक लढविणार नाही म्हणणाऱ्या सतेज पाटील यांची घोषणा कुठे विरली? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात केला.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने शक्तीप्रदर्शन करत सत्यजीत कदम यांचा उमेदवारी अर्ज भरला. जंगी मिरवणूक काढत अर्ज भरल्यानंतर आमदार पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना लक्ष्य केले. ‘कोल्हापुरात कुणीही राजीनामा द्या, तिथे पोटनिवडणूक घ्या, तेथे मी निवडून आलो नाही तर हिमालयात जाईन असे मी म्हटले होते. हे खरे आहे. पण सतेज पाटील यांनीही थेट पाईपलाईनचे पाणी शहराला न दिल्यास निवडणूक न लढविण्याची घोषणा केली होती. पाणी तर आलेच नाही, त्यांनी मात्र निवडणूक लढविली, मंत्री झाले. या घोषणेचे काय झाले असा सवाल करून आमदार पाटील म्हणाले, ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढवत आहोत. पन्नास वर्षात काँग्रेसने काय केले हे सांगावे, आम्ही पाच वर्षात काय केले ते सांगतो. हे सांगितलं तर काँग्रेसची पळताभुई थोडी होईल. पालकमंत्र्यांनी टोलची पावती फाडली, आम्ही मात्र कोल्हापूरचा टोल रद्द केला. अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्यास निधी दिला. विमानतळाचा विस्तार केला,’ अशी कामाची जंत्री त्यांनी मांडली.
‘पालकमंत्री पाटील हा माणसं खाणारा माणूस आहे असा टोला मारताना ते म्हणाले, पालकमंत्री पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते शिवसेनेला संपवायला निघाले आहेत. उमेदवारी नाकारून त्यांनी त्यांचा डाव यशस्वी केला आहे. भाजपचे पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते धनंजय महाडिक म्हणाले, पालकमंत्र्यांना सर्व काही आपल्याच ताब्यात हवे आहे. प्रत्येक गोष्टीचा रिमोट त्यांना आपल्या हाती हवा आहे. त्यांनी पोलिसांचा वापर करत दबावाचे राजकारण सुरू केले आहे. पण याला जनता बळी पडणार नाहीत. बारा एप्रिलला काँग्रेसचे बारा वाजल्याशिवाय राहणार नाहीत.’
